Friday, June 9, 2023

आमचे गुरू : डॉ. अरविंद संगमनेरकर

आमचे गुरू : डॉ. अरविंद संगमनेरकर

- धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे




रविवार, दि. 4 जून 2023 रोजी पुण्यातील नामवंत ज्येष्ठ स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ; तसंच 'शतायुषी' या आरोग्यविषयक दिवाळी अंकाचे संपादक डॉ. अरविंद संगमनेरकर (माझे आणि माझी पत्नी डॉ. मीनलचे गुरु) यांचं सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या काही आठवणी...

साधारणपणे २०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट... माझ्या उमेदवारीच्या काळात पेपरमधील जाहिरात पाहून 'शतायुषी' अंकासाठी नोकरीकरिता अर्ज केला.

सिलेक्ट झालो. तेव्हापासूनच 'शतायुषी' परिवाराशी नाळ जुळू लागली. पुढे तिथे एक employee म्हणून न राहता 'शतायुषी' आणि संगमनेरकर परिवाराचा सदस्य झालो.

सरांसह सर्वांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं, सांभाळलं. पुण्यात माझं एक हक्काचं घरच झालं म्हणा ना.

हे सगळं घडलं ते डॉ. अरविंद संगमनेरकर म्हणजे आमचे मोठे सर आणि त्यांच्या पत्नी डॉ. आशा वहिनी यांच्यामुळे.

पांढरा शुभ्र सफारी, त्यावर एम्ब्रॉयडरी केलेलं छोटंसं गुलाबाचं फुल. हात पाठीमागे बांधून ताठ चालणं, माणसांमध्ये रमणं म्हणजे मोठे सर...

'शतायुषी' दिवाळी अंकाची गडबड साधारणपणे 2, 3 महिने आधी सुरू व्हायची. तेव्हा रात्री जेवण झाल्यावर 10 वाजल्यापासून उशिरापर्यंत जागून मी आणि मोठे सर त्यांचे अंकातील लेख तयार करत बसायचो. तसं पाहिलं तर, लेखाचं काम साधारण तासाभराचं असेल; पण आमच्या अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. कौटुंबिक, संगीत, साहित्य, नाटक... अशा अनेक... 

असंच सरांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनबाबत व्हायचं. सरांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानं व्हायची. केवळ मेडिकलच्या विषयावरच नाही तर, विविध विषयांवर... त्या स्लाईड्स करण्याचं काम माझ्याचकडे असायचं. ते कामही रात्री उशिरापर्यंत चालायचं.

अंकाचे लेख, स्लाईड्स करतांना सर त्यात असंख्य बदल करायचे. सारखे सारखे बदल करून मी वैतागायचो. चिडचिड व्हायची. कधीकधी सरांचे आणि माझे त्यावरून किरकोळ वादही व्हायचे. पण मजा यायची; कारण आमच्यात जनरेशन गॅप खूप असल्यामुळे आमचे एकमेकांचे विचार क्वचित कधीतरी 'पटायचे नाहीत'. मात्र हळूहळू मी त्यांच्या विचारांशी जुळवून घ्यायला शिकलो. त्यातून मला एक कळलं की, सर उगाच सारखे बदल करत नाहीत. जे काही (लेख,स्लाईड्स) तयार होईल, ते एकदम perfect आणि उत्तमच असलं पाहिजे. कामात Perfectionist राहण्याची थोडीफार सवय लागली ती सरांमुळेच...

माझ्या एका मोठ्या वाईट काळात माझा परिवार, मित्रमंडळी यांच्याप्रमाणेच मला ज्यांनी जपलं, ते मोठे सर, वहिनी, संगमनेरकर व दारव्हेकर परिवार, शतायुषी व संपूर्ण कॉलनी नर्सिंग होमचा स्टाफ आणि डॉक्टर्स या सर्वांनी. या काळात मला मित्रांप्रमाणेच सरांनी मला अजिबात एकटं पडू दिलं नाही. शारीरिक, मानसिक आणि वेळप्रसंगी आर्थिक बाबतीतही माझे भक्कम आधार झाले.

या काळात आणि पुढे कायमच सर मला त्यांच्याबरोबर नेहमी प्रवासाला, व्याख्यानांना न्यायचे. बरेचदा व्याख्यानांच्या वेळी मीच त्यांच्या स्लाईड्स स्क्रीनवर दाखवायचो. सरांच्या पत्नी डॉ. आशा वहिनी गमतीत म्हणायच्या की, "एकेका प्रेझेंटेशनवर हे दोघं इतकं काम करतात की, कधी सर नसले तर, धनंजयच सरांच्या ऐवजी व्याख्यान देऊन येईल. इतकं ते त्याच्याही डोक्यात फिट्ट बसलंय."

सरांबरोबर महाराष्ट्रात खूप प्रवास केला. त्या प्रवासातही आमच्यात अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. "सध्या नवीन काय वाचतोय? अमुक पुस्तक वाच." माझ्याकडे ते पुस्तक नसेल तर, त्यांच्याकडील पुस्तक द्यायचे. मग पुढच्या ट्रीपमध्ये त्या वाचलेल्या पुस्तकावर चर्चा... वाचनाबरोबरच गाणं कसं ऐकावं, कोणतं ऐकावं वगैरे छान पद्धतीने सांगत. त्याचबरोबर लेखनासाठीही उत्तेजन देत होते. लिहितांना बोली भाषेत कसं लिहावं, वगैरे वगैरे अनेक विषयांवर गप्पा... कधी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अर्थासह समजवायचे. त्यामुळे त्यावेळी माझ्याही काही ओव्या पाठ झाल्या होत्या. त्याचबरोबर ते त्यांच्या आयुष्यातले किस्से सांगत. त्यामुळे प्रत्येक प्रवास म्हणजे मैफिल असायची. त्यात सोबत त्यांचे बंधू डॉ. शरद काका असले की, गप्पांना आणखीनच रंगत यायची... 

सरांमुळे मला चांगलं वाचण्याची, चांगलं ऐकण्याची आणि चांगलं लिहिण्याची गोडी, सवय लागली... मला मोठे सर खऱ्या अर्थाने गुरू म्हणून लाभले... 

एकदा सरांचं खंडाळ्याला लेक्चर होतं. मी तेव्हा बदलापूरच्या आमच्या घरी होतो. सर, शरद काका बदलापूरच्या घरी आले. माझ्या वहिनीने केलेल्या पाहुणचाराने इतके खूष झाले की, नंतर अनेक दिवस कौतुक करत होते. बदलापूरहून जवळ असलेल्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात आम्ही गेलो. शरद काकांना प्राचीन गोष्टींमध्ये रस असल्याने त्यांना ते बघायचं होतं. मग माथेरान. तिथे घोड्यावरून फिरणं... धमाल...

पुढे मला नोकरीच्या वेगवेगळ्या संधी मिळत गेल्या; पण सरांनी मला शतायुषी सोडून जाण्यासाठी कधी आडकाठी केली नाही. उलट सतत प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे माझी त्या परिवाराशी नाळ कधी तुटलीच नाही. 

माझी पत्नी डॉ. मीनल तिथेच माझ्या आयुष्यात आली आणि माझी अर्धांगी झाली. आमचं प्रेम प्रकरण एकदा सरांच्या कानावर गेलं. सरांनी आम्हा दोघांना बोलावलं. प्रेमळ स्वरात विचारलं, "काय प्रेम बिम करताय का ?" आम्हाला सरांच्या या प्रश्नाची गंम्मत वाटली. आम्हा दोघांना वडीलकीच्या नात्याने प्रेमाने आणि काळजीपोटी काही प्रश्न विचारले. त्यांना जेव्हा खात्री पटली, तेव्हाच त्यांनी आमच्या नात्याला आनंदाने होकार दिला. 

मी केवळ ग्रॅज्युएट न राहता आणखीही पुढे शिकावं, असं सरांना सतत वाटत असे. म्हणायचे, "वाटल्यास मी तुला गाईड करतो. तुला ऍडमिशन घेऊन देतो." पण एकदा कमवायला लागल्यावर मला पुढे शिकण्यात फार काही स्वारस्य राहिलं नव्हतं; मात्र या सर्व काळात सरांनी केलेला support खूप महत्त्वाचा होता. 

लग्नानंतर मी मीनलच्या भक्कम पाठिंब्यामुळे  डॉक्युमेंटरी फिल्म्सचा उद्योग सुरू केला. या कामामुळे माझा विविध विषयांवर अभ्यास होत गेला. सर तेव्हा खूप खूष झाले होते. "डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने का होईना, मुलगा पुन्हा अभ्यासाला लागला."

माझ्या पहिल्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या कामाला सुरुवात करतांना, मला कळत नव्हतं की कशी सुरुवात करावी, कोणाला भेटावं... मी सरांकडे गेलो. साहित्य, संगीत, शिक्षण सर्वच क्षेत्रात सरांचं मोठं स्थान होतं. साहित्य परिषदेसह विविध शैक्षणिक व अनेक संस्थांवर उच्च पदावर होते. सतत माणसांच्या गराड्यात असायचे. त्यामुळे सरांनी लगेच, तू अमुक अमुक यांना भेट, ते तुला सर्व मदत करतील वगैरे सांगून, लगेच त्या- त्या व्यक्तींशी बोलून मला त्यांच्याकडे पाठवलं. आणि कामाला दिशा मिळाली.

आमच्या लग्नानंतर सर, वहिनी आमच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमाला, माझ्या प्रत्येक फिल्मच्या स्क्रिनिंगला हजर असायचे.

नंतर अधूनमधून आमच्या भेटी व्हायच्या. 

दरवर्षी न चुकता वाढदिवसाला सर फोन करून शुभेच्छा द्यायचे. रात्री कितीही उशीर झाला तरी सरांचा फोन यायचाच. सरांचा फोन आल्यावरच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाल्यासारखं वाटायचं.

काही वर्षांनी सरांच्या बहीण - मंगला दारव्हेकर वारल्या. नंतर सरांचे जिवाभावाच्या मित्रासारखे सावली सारखे राहिलेले त्यांचे धाकटे बंधू शरद काका गेले आणि सर थोडे खचल्यासारखे वाटले. तरी सर वयाच्या 80व्या वर्षीही कामात व्यग्र होते.

नंतर कोरोना आला... आणि सदैव माणसांच्या गराड्यात राहणारे सर एकाकी झाले. त्यांचं वय लक्षात घेता कोरोनामुळे कोणालाच त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नव्हतं; पण फोनवर बोलणं व्हायचं. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर सरांना भेटायला गेलो आणि तिथेच स्तब्ध झालो. ते पूर्वीचे सर नव्हते... ज्या थाटात, डौलात राहणारे सर बघितले होते, ते हे नव्हते... त्यांच्याकडे पहावलं नाही... इथे ते लिहू शकत नाही...

नंतर हॉस्पिटलमध्ये bed ridden झालेले सर...

आणि आता सर गेले... माझा आणि माझ्या पत्नीचा मोठा आधार गेल्यासारखं वाटलं.

सरांना भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏


No comments:

Post a Comment