Thursday, August 12, 2021

बाबासाहेब, स्कूटी आणि मी...

बाबासाहेब, स्कूटी आणि मी...

 


आज 'पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे' यांचा तिथीनुसार (नागपंचमी) वाढदिवस. सर्वप्रथम त्यांना 99व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

बाबासाहेबांशी आमच्या घराचे ऋणानुबंध जुळले तेआमच्या परिवाराचे अत्यंत जवळचे स्नेही अंबरनाथचे स्व. श्री. सुभाषराव खडकबाण उर्फ भाऊ यांच्यामुळे. माझे वडील ज्येष्ठ पत्रकारसंपादक स्व. श्री. वसंतराव मेहेंदळेहे त्यावेळी ठाणे जिल्ह्यातून 'साप्ताहिक शिवगर्जनाहे वृत्तपत्र प्रकाशित करायचे. 

त्याही आधी माझे वडील 'योगेशनावाने मासिक प्रकाशित करायचे. बाबासाहेबांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नांतून १९७४ साली मुंबईत शिवतीर्थावर भव्य 'शिवसृष्टीउभी राहिली होती. त्याच्या विशेषांकाचं प्रकाशन मा. श्री. बाबासाहेबांच्या हस्ते झालं होतं.

त्यानंतर ठाण्याचे प्रथम नगराध्यक्ष श्री. वसंतराव मराठे यांनी माझ्या वडिलांकडे 'सा. शिवगर्जना' या अंकाची जबाबदारी सोपवली.

वडील असतांना त्यांच्या विनंतीवरून सा. शिवगर्जनाच्या अनेक दिवाळी अंकांसाठी बाबासाहेबांनी कथा प्रसिद्ध करण्यासाठी दिल्या होत्या. 

माझे वडील होतेतेव्हा बाबासाहेब आमच्या बदलापूरच्या घरी दोनवेळा आले होते. त्यातली एक भेट आठवते. एकदा बदलापुरात बाबासाहेबांची व्याख्यानमाला होती. माझे मोठे बंधू श्री. गजानन मेहेंदळे आणि मी त्याला हजेरी लावायचो. माझ्या वडीलांचं त्यावेळी एक ऑपरेशन झाल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. शेवटच्या दिवशी व्याख्यान संपल्यावर मी आणि दादा बाबासाहेबांना जाऊन भेटलो. त्यांनी दादाजवळ वसंतराव का आले नाहीयाबद्दल चौकशी केली. नंतर थोडं बोलणं झाल्यावर आम्ही निघालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला जायच्या आधी ते आमच्या घरी आले. आम्ही राहायचो ती जुनी इनामदार वाडी... 'राजा शिवछत्रपतीलिहिलेली एक मोठी मॅटॅडोर गाडी वाडीत आली. वाडीतले चाळकरी कुतुहलाने बघू लागले. वाडीतलं कोणीतरी "तुमच्याकडे बाबासाहेब आले" म्हणून सांगायला आले. आमची धावपळ सुरू झाली. आम्हाला अनपेक्षित असा सुखद धक्का होता. गाडीतून बाबासाहेब उतरले. घरी आले. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस झाली. गप्पाचहा पाणी झाल्यावर जेव्हा बाबासाहेब परत जायला निघालेतेव्हा बाबासाहेबांना बघण्यासाठी मोठी गर्दी बाहेर जमली होती. ते परत जातांना दोन्ही बाजूला खूप लोकं उभी होती. मला त्यावेळी त्या वलयाचं खूप आकर्षण वाटलं होतं.

मी पुण्यात स्थायिक झाल्यावर बाबसाहेबांशी अनेकवेळा भेट झाली/ होते. कधी मनमोकळीतर कधी ओझरती... जाणता राजाव्याख्यानांना आणि वैयक्तिकही अनेकवेळा.

पर्वतीजवळ सहकारनगरमध्ये राहात असतांनायेण्या जाण्याच्या वाटेवर बाबासाहेबांचं घर... त्यामुळे दार उघडं असेल आणि समोर बाबासाहेब दिसले कीभेटायला जायचो. 


सकाळी लवकर गेलो, तर बाबासाहेब दाराजवळ खुर्चीमध्ये लुंगी आणि बंडी घालून पेपर वाचत बसलेले असायचे.  

"या या..." म्हणत पेपर बाजूला ठेवायचे. कधी चहा मागवायचे. बरेचदा गप्पांचा मूड असायचातर कधी आपणच त्यांना काहीतरी विचारून बोलतं करायचं. मग त्यांच्या पोतडीतून वेगवेगळे किस्से बाहेर निघायचे. अगदी महाराजांबद्दलच असं नाहीतर चालू घडामोडीकिंवा अन्य काही... कधी ते स्वतःच्याच विचारात - चिंतनात मग्न असायचे.


नंतर काही कारणांमुळे बाबासाहेबांना येताजाता सहज भेटता येत नव्हतं. मग प्रतापरावांना फोन करूनबाबासाहेबांच्या प्रकृती आणि वेळेनुसारकिंवा कधी भाऊ खडकबाण यांच्यामुळे भेट व्हायची.


बाबासाहेबांना अगदी जवळून अनुभवण्यापूर्वी मला वाटायचं कीते म्हणजे गंभीर व्यक्तिमत्वफक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दलच बोलणारेअसं वाटायचं... पण मी पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांच्याशी भेट होऊ लागली आणि हा गैरसमज दूर झाला. एकदा मी, माझी पत्नी डॉ. मीनल आणि मेव्हणे डॉ. रोहित - आम्ही 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा बघायला गेलो होतो. तिथे बाबासाहेबही सिनेमा बघायला आले होते.

हळूहळू त्यांच्या आवडी निवडी कळत गेल्या. त्यातून कळलेली त्यांची एक आवड म्हणजे सोनचाफ्याची फुलं... योगायोगाने मलाही सोनचाफ्याची फुलं आवडतात. मग काय, एरवी मी त्यांच्या वाढदिवसाला एखादं छान फुलाचं रोप घेऊन जायचो, त्याऐवजी ही फुलं घेऊन जायला लागलो.

एकदा सकाळी मी त्यांच्याकडे गेलो. नमस्कार केला. त्या दिवशी त्यांच्या घरात आतमध्ये मोठ्या ड्रममध्ये जुन्या गंजलेल्या तलवारीदांडपट्टा अशी अनेक शस्त्रे ठेवली होती. म्हटलं, "बाबासाहेब हे काय ?"

"थोडं थांबा. सांगतो." असं म्हणून आत गेले. एक डबा आणला. तो उघडून माझ्यासमोर धरला. आत बेसनाचे लाडू... म्हणाले, "घ्या..." मी संकोचलो थोडा. पुन्हा आग्रह केला. मी एक लाडू घेतला. 

"तर म्हणालेतुम्हाला हात किती आहेत ?" 

"आहो बाबासाहेब खरंच नको..."

घ्या ते दोन्ही हात भरून..."

तरी मी एकच घेतला. आग्रह करून दुसरा घ्यायला लावला. मग लहान बाळासारखा दोन मुठीत दोन लाडू घेऊन खात बसलो.

ते झाल्यावर म्हणाले, "चलाहे काय चाललंयते दाखवतो. चप्पल घालूनच आत या. पायात रुपेल काहीतरी..." मी त्यांच्या मागोमाग आत गेलो. कुठल्यातरी ठिकाणी त्यांना जुनीअत्यंत दुर्मीळ शस्त्र मिळाली. शिवकालीन ठेवा... ती शस्त्र अत्यंत गंजलेल्या अवस्थेत होती. त्या ड्रममध्ये अॅिसड की काहीतरी होतं, त्यात ठेवली होतीगंज साफ करायला... ज्या तलवारी साफ झालेल्या, त्या एकेक करून हातात देत दाखवत होते. त्यांची माहिती देत होते. एक दणकट तलवार त्यांनी काढली. अत्यंत जड... मला म्हणाले, "घ्याउचला ती तलवार." ती तलवार बघूनच माझे डोळे विस्फारले गेले. मनात म्हटलं, 'आत्ता ही जर का आपल्याला उचलता आली नाहीतर काही खरं नाही.सगळी शक्ती एकवटली आणि तलवार उचलली. बाबासाहेबांनी टाळी वाजवली आणि चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत म्हणाले, "मगाशी तुम्ही जे दोन लाडू खाल्ले नात्याचा हा चमत्कार." मनमुराद हसलो. 

त्यावेळी मला माझ्या लहानपणीची त्यांच्याबरोबरच्या भेटीची आठवण झाली. त्यांना ती सांगितली. सहावी-सातवीत असेन मी तेव्हा. आई वडिलांबरोबर पहिल्यांदा बाबासाहेबांकडे आलो होतो. दिवाळीच्या सुमारास. वर उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा असलेला त्या वर्षीचा दिवाळी अंक देण्यासाठी आम्ही आलो होतो. तेव्हाही अशीच एक जड तलवार मी उचलली होती. त्यावेळी एका तबकातून कोणीतरी ती तलवार बाबासाहेबांसमोर आणली. मला म्हणाले, "बाळराजेउचला ही तलवार." मी घाबरलोकारण ती तलवार दिसायलाच एवढी भरभक्कम होतीतर उचलायला किती जड असेल... वडील म्हणाले, "जा उचल. जमेल तुला." वडिलांनी धीर दिल्यावर उठलो आणि क्षणात ती तबकातली तलवार उचलून वर धरली. बाबासाहेबांनी लगेच "शाब्बास राजे!" म्हणून पाठ थोपटली. त्यांनी एकाला बोलवून काहीतरी सांगितलं. थोड्याच वेळात ते गृहस्थ एक मोठं पुस्तक घेऊन आले. मी आई बाबांकडे बघितलं. बाबांनी डोळ्यांनीच 'काही बोलू नको. बघ फक्त.म्हणून खुणावलं. मी गप्प बसून बघत होतो. बाबासाहेबांनी त्या पुस्तकावर काहीतरी लिहिलंआणि म्हणाले, "बाळराजेइकडे या." मी त्यांच्याजवळ दबकत गेलो. 'राजश्री धनंजयराव मेहेंदळे यांस शुभाशीर्वाद पूर्वक सादर !असं लिहून त्यांनी मला त्यांचं 'महाराजहे पुस्तक भेट दिलं. मी एकदम भारावून गेलो. त्यांना नमस्कार केला. 

'शेलारखिंड' या कादंबरीची एक प्रत बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना पूर्वी दिली होती, तीही आहे.

 

बाबासाहेबांना त्या दिवशी शस्त्र बघतांना मी हा किस्सा सांगितला. बाबासाहेब नेहमीसारखे प्रसन्न हसले. लहानपणच्या पहिल्या भेटीच्या वेळी जशी तलवार मला त्यांनी उचलायला दिली होतीत्यापेक्षा मोठी जड तलवार त्यांनी यावेळी मला उचलायला दिली होती. 

त्यानंतर त्यांनी चांदीचं सुंदर नक्षीकाम केलेल्या मुठीची छान तलवार दाखवली. त्याचबरोबर इतर काही तलवारीदांडप‍‍‍‍ट्टे दाखवले. बाबासाहेबांबरोबर अशाप्रकारे शस्त्र पाहण्याचा माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता.

काही वर्षांपूर्वी अंबरनाथ बाबासाहेबांची व्याख्यानमाला होतीमी आणि माझा मित्र योगेश कुलकर्णी त्याला जायचोतो पहिल्यांदाच बाबासाहेबांना ऐकत होता. बाबासाहेबांच्या धीरगंभीर आवाजात 'सा मां पातु सरस्वती भगवती...या सरस्वतीच्या आवाहनाने व्याख्यानाला सुरुवात झाली, आणि तिथेच तो स्तब्ध झाला. झपाटल्यासारखी ती व्याख्यानं ऐकली. शेवटच्या दिवशी रात्री व्याख्यान संपल्यावर भाऊकाकांना (खडकबाण) भेटलो. ते म्हणाले, "आता घरी चला. बाबासाहेब माझ्याकडेच मुक्कामाला आहेत. इथे गर्दी आहेतेव्हा घरी बाबासाहेबांशी निवांत भेट होईल."मग आम्हाला एका गाडीत बसवून घरी घेऊन गेलेआधी बाबासाहेबांचं व्याख्यान आणि नंतर भाऊकाकांमुळे बाबासाहेबांशी घडलेली भेटयामुळे योगेश अतिशय खुश झाला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची सावली आम्हाला दिसली, ते म्हणजे स्व. प्रतापरावदादा... बाबासाहेब जेवायला बसत होते. बाबासाहेबांच्या आवडी निवडी, पदार्थांची चव, त्यांना काय चालतं- काय नाही वगैरे सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांना होती. दादा काही पदार्थ चमच्याने थोडे हातावर घेऊन चाखत होते. तिखट मिठाचं योग्य प्रमाण पाहून, मगच बाबासाहेबांना ते स्वतः वाढत होते. इतक्या बारीकसारीक गोष्टींची ते काळजी घेत होते.

मला बाबासाहेबांबरोबर एकदा अगदी छोटा का असेनाप्रवास करण्याचं भाग्य लाभलं... प्रवास म्हणजे काय तरपर्वती ते विश्रामबाग वाडा...

साधारणपणे १७-१८ वर्षांपूर्वी असेल. सकाळी १० च्या सुमारास बाबासाहेबांच्या घरासमोरून जात होतो. दार उघडं दिसलं. आत गेलो. बाबासाहेब बेचैन वाटले. येरझाऱ्या मारत होते. म्हटलं, "बाबासाहेब काय झालं ?" म्हणाले, "११ वाजता विश्रामबाग वाड्यावर मिटींगसाठी जायचंय. दहा वाजून गेलेअजून कोणी आलं नाही. गाडीपण नाही." 

माझ्याकडे छोटी जुनी स्कूटी होती. त्याच्यावरून त्यांना घेऊन जावं का ? असा विचार मनात आलापण एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यावरून कसं घेऊन जायचं ? म्हणून मी काही बोललो नाही. त्यांना म्हटलं, "थांबारिक्षा आणतो."

ते म्हणाले, "थोडं थांबा. हा पेढा खा. तसेच निघू नका." बाबासाहेबांकडे इतकेवेळा गेलोयपण त्यांनी कधी मला (आणि सगळ्यांनाच) रिकाम्या हाताने पाठवलं नाही. अगदी चहा नाही देता आला तरीपेढावडी काहीतरी हातावर ठेवतातच. असो...

पटकन पेढा तोंडात टाकून बाहेर रिक्षा बघायला गेलो. घराबाहेर एकही रिक्षा उभी नव्हती. आणि ज्या येत जात होत्यात्याही भरलेल्या. 

बाबासाहेब बाहेर आले. म्हणाले, "तुम्ही कसे आलात ? म्हटलं छोटी स्कूटी आहे माझ्याकडे..." "चला मग जाऊ सोबत. तुम्हाला वेळ आहे ना?" मी म्हटलं, "मला चालेलपण तुम्ही यावर बसून याल?" (मी गाडीकडे बोट दाखवलं.) 

"छान आहे. वेळेच्या आधी पोहोचणं महत्वाचं. चला."

हे मात्र खरं आहे. कोणत्याही कार्यक्रमाला बाबासाहेब वेळेच्या आधी पोहोचतात आणि वेळेवरच कार्यक्रमाला सुरुवात करतात. ही त्यांची शिस्तच... 

बाबासाहेब गाडीवर डबलसीट बसले. म्हणाले, "आधी देवाला जाऊ. आमचं देवघर बघा." मग घराच्या मागे असलेल्या देवांना नमस्कार केला. तिथून विश्रामबाग वाड्यावर जायला निघालो.

एका मोठ्या व्यक्तीला आपल्या गाडीवरून आणि त्यातही छोट्या स्कूटीवरून डबलसीट घेऊन जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव. स्कूटीवरून त्यांना नेतांना थोडं दडपण आलेलं. कारण जेव्हा ज्या बाजूला वळायचं असेलतेव्हा बाबासाहेब त्या बाजूला झुकायचे. मला बॅलन्स जाऊन आम्ही पडतो की कायअसं वाटायचं. त्यांना सुखरूप वाड्यावर सोडणं महत्वाचं होतं. 

आम्ही जात असतांना अनेक लोक बाबासाहेबांना स्कूटीवर बसून जातांना बघूनआदराने आणि कौतुकाने थांबूनमागे वळून वळून बघत होते. मला खूप मजा वाटली. 

विश्रामबाग वाड्यावर त्यांना सुखरूप सोडलं. म्हटलं, "त्रास नाही ना झाला?" तर, "अजिबात नाही. तुमच्याबरोबर आल्यामुळे अगदी वेळेत पोहोचलो." त्याबद्दल आभार मानू लागले. आत येण्यासाठी आग्रह करू लागले. "संग्रहालय बघा. चहा घ्या" म्हणाले. 

आधीच मी त्यांना अशा जुन्या छोट्या गाडीवरून घेऊन गेलोयाबद्दल मला संकोचल्यासारखं वाटत होतंतर दुसरीकडे या मोठ्या माणसाबरोबर आपण आलो याचा प्रचंड आनंदही झाला होता.   

पण एक मात्र खरंएवढी मोठी सन्माननीय व्यक्ती असूनही (मानाने आणि वयानेही- त्यावेळी वय साधारणपणे ८०च्या आसपास) माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे बसून येतेत्यांच्या या साधेपणाने मी खूपच भारावून गेलो...

 पुन्हा एकदा आदरणीय श्री. बाबासाहेबांना 

९९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

 


17 comments:

  1. फारच छान आठवणी आणि तुमचं लिखाण पण छानच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊
      कृपया आपलं नाव कळू शकेल का ? 🙏🏻😊

      Delete
  2. बाबासाहेबांसोबत तुमच्या आठविणींचा खजीना एक अनमोल ठेवा आहे. तुम्ही छान लिहिता आणि तुमच्या आठवणी वाचून मीही त्यात रममाण झालो. तुमचे खूप खूप आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद अतुलजी ... 🙏🏻😊

      Delete
  3. बाबासाहेबांसोबत तुमच्या आठविणींचा खजीना एक अनमोल ठेवा आहे. तुम्ही छान लिहिता आणि तुमच्या आठवणी वाचून मीही त्यात रममाण झालो. तुमचे खूप खूप आभार. अतुल प्रभाकर नाईक, पिंपरी, पुणे.

    ReplyDelete
    Replies
    1. अतुलजी, मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊

      Delete
  4. सुंदर लिखाण,धनंजय..

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊
      कृपया आपलं नाव कळू शकेल का ? 🙏🏻😊

      Delete
  5. Khup khup chhan lihile aahes..agadi dolyasamor prasang ubhe karatos likhanatun..agadi donhi hatat ladoo getalela dhanajay Ani scooter var basalele babasaheb..sarv dolyasamor ubhe keles.khup chaan.keep writing..

    ReplyDelete
    Replies
    1. दिप्ती, मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊

      Delete
  6. खूपच छान लिखाण,त्यातील भावना व त्या मांडण्याची सरल पद्धत.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊
      कृपया आपलं नाव कळू शकेल का ? 🙏🏻😊

      Delete
  7. Khup chan athvan khup chan tumche likhan prasng dolya smor ubha rahila chanSunil sunita joshi

    ReplyDelete
    Replies
    1. मावशी, काका मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊

      Delete
  8. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊

      Delete